कितीरे वाट पहायला लावतोस ….
अगदी वर्षाच्या शेवटी येतोस बघ
बारा भावंडातील शेंडेफळ ना…
म्हणून सर्वांचा लाडका …..
हिरव्यागार निसर्गाच्या पायघड्यांवरून , धुक्याची शाल लपेटून , गुलाबी थंडी पसरवत एखाद्या रूपगर्वितेसारखा दिमाखात येतोस .
सर्वांना भरभरुन चैतन्य व उत्साह देतोस अगदी हातचे काही न राखता ……
भरपूर खा … प्या ….व्यायाम करा असा संदेश घेऊन तू येतोस त्यामुळे दिवाळीनंतर आलेली मरगळ झटकून गृहिणी परत लगबगीने खाद्य पदार्थ करायला लागतात .
सुरुवात होते ती डिंकाच्या लाडवाने . बाजरीचा भात , वांग्याचे भरीत , मिरचीचा ठेचा , त्याबरोबर गरम गरम भाकरी , हुलग्याचे शिंगोळे , वेगवेगळ्या चटण्या यामुळे रसना तृप्त होते . हा स्वर्गिय आनंद फक्त तूच देऊ शकतोस .
हुरडा पार्टी तर तुझ्याशिवाय होतच नाही .आणि पतंगोत्सव तो तुला मानाचा शिरपेच देऊन जातो .
रात्री शेकोटीच्याभोवती बसून मारलेल्या गप्पा , गाणी यांचा आनंद केवळ अवर्णनीय …..
अश्या सर्व उत्साहवर्धक वातावरणातच तुझ्यामुळे आम्हाला मिळतात .
नाताळ हा खरे तर आपला सण नाही पण …….
जायच्या आधी तू आम्हाला तो भेट म्हणून देतोस , तुझ्यावरच्या प्रेमाने आम्ही तो स्वीकारतो आणि सांताक्लाँजच्या प्रेमात पडून नाताळचा आनंद घेतो .
तू आम्हाला खूप जवळचा वाटतोस………
वर्षभरातील सर्व गुपिते उघड करण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे तू ……..
वर्षभरातील केलेल्या चुकांची कबुली व नवीन संकल्प तुझ्याच साक्षीने होतात .
चांगल्या वाईट गोष्टींचा पाढा तुझ्या समोरच वाचला जातो .
पण सर्व माफ करुन नवीन उमेद तूच देतोस .
आणि येतो तो तुला निरोप देण्याचा दिवस ………..
तुझ्यामुळे आम्हाला नवीन वर्ष , चुका सुधारण्याची संधी , नवी स्वप्ने साकारण्याची जिद्द मिळते म्हणून आम्ही धूमधडाक्यात तुला निरोप देतो .
या कृतज्ञता सोहळ्यात गुंग असतानाच तू हुलकावणी देऊन निघून जातोस ………
हुरहुर लावून ………
मन हळवं करुन …….
सदैव तुझ्या प्रेमात




