✍🏽गोष्ट प्रेमाची.
बायकोनं घरात मांजर पाळलेलं ..
तिचं ते खूप लाडकं.. ती जेवायला बसली की तिलाही घेवून बसायची… एका वाटीत दूध भाकर कुस्करुन द्यायची… पण नवऱ्याला ते मांजर अजिबात आवडायचं नाही… उघडं दिसेल त्या भांड्यात तोंड घालायची त्याला सवय… त्याचा त्याला प्रचंड राग यायचा…*
एकदा नवरा जेवायला बसलेला आणि नेमकं मांजर त्याच्या ताटात तोंड घालतं… नवरा चिडतो आणि रागारागाने शेजारी असलेला ठोंब्या त्याच्या डोक्यात घालतो.. घाव वर्मी बसल्याने मांजर बराच वेळ निपचित पडून राहतं… मेलं की काय अशी शंका येत असतानाच ते अंग झटकून उठून बसतं… हळूच नवऱ्याकडे हसून बघतं… आणि चक्क ‘शॉरी यार, मी मघाशी तुझ्या ताटात तोंड घातलं… क्या करे आदत से मजबूर हूँ… पुन्हा नाही असं करणार..’असं माणसासारखं बोलतं… नवरा वेडा व्हायचाच बाकी…
त्यानंतर मांजर नम्र आणि आज्ञाधारक होतं.. ताटात तोंड घालणे तर सोडाच दारातला पेपर आणून दे.. टी पॉय वरचा चष्मा आणून दे अशी बारीकसारीक कामं ते करू लागतं… मग काय नवऱ्याची आणि त्याची छान गट्टी जमते…ऑफिस मधून येताच मांजर दिसलं नाही की तो अस्वस्थ व्हायचा..’अग मन्या दिसत नाही ग कुठं..?’
बायकोला सतत विचारत राहायचा..
असेच काही दिवस गेल्यावर एकेदिवशी सोसायटीच्या दारात बेवारस कुत्रीआणि मांजरं पकडून नेणारी महानगरपालिकेची व्हॅन येवून थांबते..मन्या खिडकीतून ती व्हॅन बघतो.. त्याच्या मनात काय येतं कोण जाणे पण धावत जावून तो व्हॅन मधे बसतो… नवरा हे बघतो.. हातातला पेपर पटकन बाजूला टाकून तो मन्यामागे धावतो… मन्या व्हॅनमध्ये निवांत बसलेला…
नवरा म्हणतो “मन्या, अरे इथं गाडीत का बसलायस? ही गाडी बेवारस मांजरासाठी आहे..तुझ्यासाठी नाही “
‘मला माहितीय… पण मला जायचंय आता’ मन्या शांतपणे बोलतो..
‘मन्या,अरे असं काय करतोस? तू किती लाडका आहेस आम्हा दोघांचाही.. माझं तर पानही हालत नाही तुझ्याशिवाय… तू क्षणभर नजरेआड गेलास तरी मला करमत नाही… मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर आणि तू खुशाल मला सोडून निघालास.. ए प्लिज…प्लिज उतर रे आता ‘ काकुळतीला येवून तो बोलतो
मन्या गोड हसतो आणि बोलतो ‘तू माझ्यावर प्रेम करतोस?…..माझ्यावर?’
‘ म्हणजे काय शंकाय का तुला?’
‘मित्रा,अरे मी जेंव्हा माझ्या मनासारखं वागत होतो, हवं तिथं हवं तेंव्हा तोंड घालत होतो तेंव्हा मी तुझा नावडता होतो.. सतत रागवायचास माझ्यावर…अगदी माझ्या जीवावर उठला होतास तू एकदा… .पण जेंव्हा मी तुझ्या मनासारखं वागू लागलो… तुला हवं तसं करू लागलो.. तेंव्हा तुला आवडू लागलो… तू माझ्यावर प्रेम करू लागलास यात नवल ते काय?
नॉट सो स्ट्रेंज यार…!!
वपुंची ही कथा खूप काही सांगून जाते… जेंव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो तेंव्हा ते खरंच त्याला बरं वाटावं म्हणून की स्वतःला बरं वाटावं म्हणून करतो ?
समोरचा जो पर्यंत आपल्या मनासारखं वागत असतो तोपर्यंत त्याच्यावर आपलं प्रचंड प्रेम असतं.. कारण त्याचं वागणं आपल्याला सुखावणारं असतं…पण जेंव्हा तो आपलं ऐकत नाही… आपल्याला हवं तसं वागत नाही… तेंव्हा त्याचं आपल्या सोबत असणही आता नकोसं वाटतं…त्याला टाळत राहतो…भेटलाच कधी तर त्याच्यावर चिडतो, रागावतो….त्यानं नाहीच ऐकलं की मग वर्मी घाव घालून नातंच संपवून टाकतो…ज्याच्यावर जीवापाड प्रेम असतं त्याला क्षणात परकं करून टाकतो ..
आश्चर्य आहे ? का वागतो असं आपण ?
त्याच्यावर खरंच आपलं प्रेम असतं की निव्वळ टाइम पास म्हणून केलेली खोटी भावनिक गुंतवणूक?
आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं… अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं,त्याला समजून घेणं जेंव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो..!!




